श्रीधरणीधर महाराज, हे चिंतामणी महाराज (दुसरे) यांचे जेष्ठ पुत्र होते. वडिलांच्या हयातीमध्येच त्यांना गादीवर बसण्याची आज्ञा झाली. हे पण आधीच्या परंपरेप्रमाणे साक्षात्कारी व सिध्द पुरुष होते. यांच्या कालखंडात साताऱ्याच्या शाहूमहाराजांना श्री मंगलमूर्तींचा दृष्टांत झाला व श्रींच्या दर्शनास जाण्याची आज्ञा झाली. शाहूमहाराज मंगलमूर्तींच्या दर्शनासाठी निघाले असता, समोरुन श्रीधरणीधर महाराज येत होते. त्या वेळी शाहूमहाराजांना समजले की, आपण स्वप्नात ज्यांचे दर्शन घेतले ते हेच आहेत. अंतरीची खुण पटताच दोघांनीही एकमेकांना दंडवत घातले. श्री धरणीधर महाराजांना राजकीय महत्त्व होते.
त्यांच्या कारकिर्दीत चिंचवड मध्ये टांकसाळ सुरु झाली. त्यामुळे संस्थानच्या उत्पन्नात वाढ झाली व अनेक समाजोपयोगी कामे करता आली. महाराजांनी मोरगावचे देऊळ, सिध्दटेकचे देऊळ, थेऊरचे देऊळ व चिंचवडच्या काळभैरवनाथाचे देऊळ बांधले.